
आली पाखरं परत । घरट्यांत झोपी गेली
सारं कसं शांत शांत । जशी जगा पेंग आली
ऐकतो मी माझा श्वास । ऊर होई वर खाली
थकले रे माझे डोळे । आता तिन्हीसांज झाली
भगभगीत उजेड । पाडला मी तारुण्यात
म्हणे जग बदलीन । खूप केली यातायात
आता उतारवयात । मला समजूत आली
थकले रे माझे डोळे । आता तिन्हीसांज झाली
फिरलो मी गोल गोल । जसा बैल चऱ्हाटाला
आयुष्याच्या शर्यतीत । नाही विजय मिळाला
आता निर्माल्य निवृत्ती । माझ्या नशिबाला आली
थकले रे माझे डोळे । आता तिन्हीसांज झाली
गेले सोडून मजला । सारे सखे नि सोबती
आता एकलेपणाची । वाटतसे मज भीती
फार उशीराने मला । जीवनाची जाण आली
थकले रे माझे डोळे । आता तिन्हीसांज झाली
कधी वळून पाहतो । कसं आयुष्य घडलं
दुज्यां देऊन टाकलं । जे का पदरी पडलं
होऊ पाहतो सूर्यास्त । उन्हं उतरली खाली
थकले रे माझे डोळे । आता तिन्हीसांज झाली
आयुष्य चक्राच्या अटळ आणि अपरिहार्य स्थितीचे मनस्पर्शी वर्णन….
LikeLike